ठेकेदारांची बिले देण्यासाठी पैसे नाहीत मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटी कर्ज काढून ८६ हजार कोटीचा रस्ता कशासाठी?

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील हर्षल पाटील या ३५ वर्षाच्या तरूणाने काल आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. राज्य सरकारकडून बिल वेळेत न मिळाल्यानं त्याने टोकाचा निर्णय घेतला. यामध्ये 1.40 कोटी थकित, कामासाठी 65 लाखांचं कर्ज काढलं होते.

याबाबत आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्येनंतर राज्यात आता ठेकेदार आत्महत्या करू लागले आहेत. मुख्यमंत्री महोदय ही तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील हर्षल पाटील या ३५ वर्षाच्या तरूणाने आत्महत्या केली.
त्याला पाच वर्षाची लहान मुलगी आहे. एकीकडे ठेकेदारांची बिले देण्यासाठी पैसे सरकारकडे पैसे नाहीत मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी हुडको कडून २० हजार कोटी कर्ज काढून ८६ हजार कोटीचा रस्ता करण्याचा अट्टाहास कशासाठी करत आहात? तुम्ही सामान्य जनतेचा बळी घेऊन जो कारभार करत आहात तो आता शेतकरी आत्महत्या कडून कंत्राटदार आत्महत्यापर्यंत पोहचल आहे.

सध्या राज्यात ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती भयावह झाली असून अनेक कुटूंबे आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेले आहेत. गेली दिड ते दोन वर्षे झाली कामे करून ठेकेदारांना बिले मिळत नाहीत. तुमचे आमदार- खासदार मात्र टक्केवारी घेऊन मदमस्त आहेत. एका बापाच चुणचुणीत लेकरू, एका निरागस मुलीचा बाप, एका पत्नीच्या कपाळाचे कुंकू पुसण्याचे पाप तुमच्या धोरणामुळे होत आहे.
किमान आता तरी बेधुंदपणा सोडा व थोड सुधारा. असा सल्ला माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा आहे. दरम्यान, हर्षल पाटील या ३५ वर्षाच्या तरूणाने काल आत्महत्या केली. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यामुळे याबाबत सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.