आनंदाची बातमी! अखेर मान्सून विदर्भात दाखल, उर्वरीत महाराष्ट्रात कधी?

मुंबई : मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विदर्भात मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.
विदर्भात मुसळधार पावसानं मान्सूनची एन्ट्री झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या २४ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच नागपूरमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. या पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद देखील लुटला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मान्सून विदर्भात दाखल झाला असून, पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.