यशवंत बचाव कृती समितीच्या आवाहनास सभासद प्रतिसाद देणार काय ? निवडणूक का, भाडेतत्त्वावर उद्याच्या सभेकडे तालुक्याचे लक्ष…!


उरुळी कांचन : थेऊर ( ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११ मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ११ वर्षे बंद पडलेला कारखाना भविष्यात चालू करण्यासहीत संस्थेच्या वाटचालीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. अशातच यशवंत बचाव कृती समितीने कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याची निवडणूक घेणे अनिवार्य असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे सभासदांना देऊ केली आहे. त्यामुळे सभासद यशवंत बचाव कृती समितीच्या आवाहानास प्रतिसाद देणार का म्हणून सर्वसाधारण सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर यशवंत बचाव कृती समिती तर्फे कारखान्याची निवडणूक का घ्यायची व कारखाना भाडेतत्वावर का द्यायचा नाही या संदर्भात एक माहीती पत्रक सभासदांसाठी प्रसिद्धीस केले आहे.कारखान्याची निवडणूक का घ्यायची म्हणून या संदर्भात ६ मुद्दे मांडण्यात आले आहेत. शासनाच्या ताब्यातून कारखाना पुन्हा एकदा शेतकरी सभासदांच्या ताब्यात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निवडणूक आहे. निवडणूक घेतल्याने कारखाना शासनाच्या ताब्यातून पुन्हा एकदा शेतकरी सभासद यांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या ताब्यात येईल व  निवडणूक घेतल्याने संचालक मंडळ अस्तिवात येईल आणि त्यामुळे कारखाना दिवाळखोरीत (आवसायनात ) काढण्याच्या अघोरी प्रयत्नांना जागेवर थांबवता येईल. सन १९७० पासून ते २०११ पर्यंत म्हणजे सलग ४१ वर्ष चालु असणारा कारखाना, शेतकरी सभासद यांनी वेळोवेळी निवडून दिलेल्या संचालक मंडळाने चालवला. परंतु सन २०११ ला संबंधीत संचालक मंडळ बरखास्त करुन शासनाने कारखाना आजतोपर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवला आहे.

 

सन २०११ पासून ते सन २०२३ पर्यंत म्हणजे सलग १२ वर्ष सदर कारखाना शासनाच्या ताब्यात असल्या कारणाने शेतकरी सभासद यांना मर्यादित आधिकार राहीले व त्यामुळे कोणताही ठोस निर्णय आजतागायत झाला नाही किंवा शासनाला कारखाना चालू करण्यास यश आले नाही. बंद पडलेल्या कारखान्यांच्या निवडणूका घेतल्यानंतर संबंधित कारखाने पुन्हा एकदा शेतकरी सभासद यांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळा मार्फत आज पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाले आहेत. आप्पासाहेब नलवडे स. सा. कारखाना (गडहिंग्लज ), किसन वीर स. सा .कारखाना ( भुईंज ), विठ्ठल सह .सा. कारखाना (पंढरपुर ), शंकर स सा. कारखाना ( सदाशिवनगर, अकलुज ) व खंडाळा साखर कारखाना ( सातारा ) हे सहा बंद पडलेले सहकारी साखर कारखाने सभासदांनी निवडून दिलेल्या  संचालक मंडळांनी पुन्हा चालू केले आहेत.

 

त्यामुळे यशवंत बचाव कृती समितीने कारखान्याची निवडणूक कशी हिताची आहे. याबाबत सभासदांची जागृती केली आहे.  त्यासाठी त्यांनी कारखाना भाडेतत्वावर का द्यायचा नाही ? म्हणून या संदर्भात ९ मुद्दे मांडण्यात आले आहेत. ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती व सध्या इथेनॉलला असलेली प्रचंड मागणी व त्यातुन मिळणारे भरघोस उत्पन्न हेच भाडेतत्वावर न देण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. कारखाना भाडेतत्वावर दिल्याने पुढील २० ते २५ वर्ष तो भाडेकरूच्या ताब्यात राहील. तसेच करारा प्रमाणे कारखाना सोडतेवेळी त्याचा झालेला खर्च त्यास पुन्हा परत द्यावा लागतो. खर्च दिला नाहीतर भाडेकरू कारखान्याची मालमत्ता विकुन आपली रक्कम वसुल करु शकतो. भाड्यातुन मिळणारे उत्पन्न अतिशय अत्यल्प म्हणजे साधारणता १ ते २ कोटी रुपये वार्षिक असते. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे मागील उसाचे थकीत बिल, कामगारांचे थकीत देणे, तसेच सरकारी देणे व बँकांचे ओटीएस केल्यानंतर होणारी रक्कम ती या भाड्यामधुन फिटू शकत नाही. खालील तक्त्यानुसार सध्या ऊसाचा खर्च वजा जाता वार्षिक निव्वळ नफा ५० कोटी रुपये आपणास (शेतकरी सभासदांना) मिळू शकतो. १ कोटी रुपये भाडेरुपी रक्कम घेण्यापेक्षा ५० कोटी रुपये निव्वळ नफा जर शेतकऱ्यांना मिळाला. तर पुढील ३ ते ४ वर्षा मध्ये आपण वरील सर्व शेतकरी, कामगार व इतर संस्थांची देणी देऊन कारखाना नफ्यात आणुन ऊसाला उच्चांकी बाजार देऊ शकतो. हा कारखाना पुणे शहराच्या अत्यंत जवळ असल्या कारणाने कारखान्याची गोदामे, पेट्रोलपंप, शाळा यातुन आपणास चांगला महसुल मिळू शकतो. तसेच मोकळ्या जागेवरती सोलर प्लॅन्ट टाकून पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रीक बसेस साठी चार्जिंग स्टेशन उभारुन चांगला महसुल मिळु शकतो. जागेचे मुल्य चांगले असल्या कारणाने मागील लोनचे रिस्ट्रक्चर होऊ शकते. कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतर सदरचे सगळे उत्पन्न हे भाडेकरुच्या मालकीचे होईल व तो आपणाला फक्त ऊसाचा चालु बाजार भाव व भाडे देईल आणि यामध्ये मागील देणे तसेच राहून जाईल व त्यावरील व्याजाची रक्कम वाढत राहील आणि ती भाडे रकमेपेक्षा खुप आधिक असेल.

 

यशवंत बचाव कृती समितीने मांडलेला लेखाजोखा पुढीलप्रमाणे :-

इथेनॉल व इतर उत्पादन जमा खर्च (अंदाजे ) प्रति टन

१ टन ऊस = २५० सिरप = ८० लिटर इथेनॉल

★ ऊस खरेदी एफ.आर.पी.

२७५० रुपये

★ इथेनॉल उत्पादन खर्च

(८० लि. x ११ रुपये प्रति लिटर )

८८० रुपये

★ सिरप उत्पादन खर्च

२०० रुपये

★ ऊस तोडणी व वाहतुक खर्च

७०० रुपये

★ इथेनॉल विक्री ८० लिटर  X ६५.६१ प्रती लिटर  =

५२४८ रुपये

★ इतर उत्पन्न (स्पेंट वॉश, कोजेन, पोटॅश, बगॅस, सीएनजी.) —   ३०० रुपये

एकूण खर्च – ४५३० रुपये

एकूण उत्पन्न – ५५४८ रुपये

खर्च वजा जाता निव्वळ नफा = ५५४८ – ४५३० = १०१८ रुपये प्रति टन शिल्लक राहतील.  जर ५ लाख टन वार्षिक गळीत झाले तर खर्च वजा जाता निव्वळ नफा खालील प्रमाणे राहील.

५ लाख टन x १०१८.०० रुपये प्रति टन = ५० कोटी ९० लाख रुपये वार्षिक निव्वळ नफा.

अशी माहिती या माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!