मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..!! भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : मुखी विठ्ठलाचं नाव आणि पंढरपूर भेटीची ओढ ही वारकरी संप्रदायाची खरी ओळख मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भक्तीपरंपरेवर राजकारणाची छाया पडत असल्याची चर्चा वाढू लागली आहे. भोळाभाबड्या भक्तीसंप्रदायात कट्टरता पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पुरोगामी कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात होता.

आता शरद पवार यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे, असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासोबतच, अशा धर्मांध आणि प्रतिगामी प्रवृत्तींची ओळख पटवण्यासाठी यादी तयार करण्यास सुरुवात केल्याचेही पवारांनी सांगितले. या वक्तव्यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली.

पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले की, “आता शरद पवार यांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे.” त्यांनी पवारांवर वारकरी संप्रदायाबाबत चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप केला.

तसेच, वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजित समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थान केली आणि आता 40-50 लोकांनी टोळी त्याच्यासाठी तयार केलीय. पण एक लक्षात ठेवा हा तुषार भोसले जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तो तुमचं षडयंत्र शिजू देणार नाही” असं तुषार भोसले म्हणाले.