किल्ले शिवनेरीवरून मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा ; म्हणाले,… तर येणारे दिवस राजकारण बरबाद करणारे असतील.

पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर दाखल झाले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणारे दिवस त्यांचं राजकारण बरबाद करणारे असतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या भावना समजून घेऊन आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असं त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना आवाहन केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास मराठा समाज कायमस्वरूपी ऋणी राहील, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत तुम्ही जाणून-बुजून एक दिवसाची परवानगी दिली आहे. यातून समाजामध्ये नाराजीची लाट उसळली आहे. तुम्ही मोठं मन दाखवून आणि गोरगरिबांच्या वेदना लक्षात घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. समाज कायमस्वरुपी तुम्हाला डोक्यावर घेईल,” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, “एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं दाखवायचं होतं, मी तर परवानगी दिली आहे, आता माझी काय चूक आहे. पण यातून राज्यात असा संदेश गेला आहे की, आधी तुम्ही कोर्ट-कोर्ट म्हणत होता, पण आता पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिल्याने परवानग्या सरकारकडेच आहेत, हे स्पष्ट झालं आहे.
