मनोज जरांगे आक्रमक! सरकारला शेवटचा इशारा; म्हणाले, १७ सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले नाही तर….

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक इशारा दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला असला तरी, कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने राबवली पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. १७ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले पाहिजे. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल,असे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमितीला थेट संदेश दिला. गावागावातील समित्या कामाला लावा. मंगळवार किंवा बुधवार कॅबिनेटची बैठक घेऊन १७ सप्टेंबरच्या गॅझेटनुसार तात्काळ निर्णय घ्या. कुठलाही बदल करू नका. नोंद असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्वरित द्या, असे त्यांनी सांगितले.
सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असतानाच जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केले. आपला विजय झाला आहे, पण काहींना तो पचत नाही. अर्धा महाराष्ट्र गोंधळलेला आहे, अभ्यासक सुद्धा गोंधळले आहेत. थोडा धीर धरा, पण अपमान सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी खासकरून राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधला. तुम्ही येवला वाल्याचे ऐकू नका. तुम्ही आमच्या मागे लागलात, तर आता आम्हीही तुमच्या मागे लागू. कुणबीतून आरक्षण आम्हाला पाहिजेच. वेळ आल्यावर जशास तसे बघू,” असे त्यांनी इशारा दिला.
जरांगे यांनी दसरा मेळाव्याचा संदर्भ देत स्पष्ट इशारा दिला की, “जर सरकारने गॅझेटची भूमिका तात्काळ जाहीर केली नाही, तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकारने जी भूमिका घेतली, त्यावर मराठा आंदोलनाचा पुढील मार्ग ठरणार आहे.