विरारमध्ये मोठी दुर्घटना ; चार मजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू तर 20 ते 25 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकले..

मुंबई : एकीकडे राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साह साजरा केला जात असताना विरारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पूर्वच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीची एक बाजू कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर या ठिकाणी 20 ते 25 जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.आणखीन काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफ 2 टीमच्या मदतीने ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे..आत्तापर्यंत 11 लोकांना मलब्याखालून बाहेर काढले असून विरार आणि नाला सोपरा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
दरम्यान या ढिगार्याखाली नागरिक अडकल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानाकडून श्वान पथक ही बोलवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
