Maharashtra Election : बहुमतापासून दूर राहिल्यास काय? महायुतीचा प्लॅन बी तयार, जाणून घ्या काय आहे प्लॅन…

Maharashtra Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येणार असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठता आला नाही तर काय यासाठी आता महायुतीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महायुती लहान लहान घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी महायुतीने प्लॅन बी तयार केला आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून आमचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तरीही बहुमातापासून दूर राहिल्यास लहान पक्षांसोबत महायुतीच्या नेत्यांनी बोलणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लहान घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीचं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सरकार स्थापनेसाठी पाठिंबा घेताना सत्तेतला वाटा घटक पक्षांना दिला जाईल अशीही माहिती समजते. महायुतीकडून महाविकास आघाडीत नसलेल्या आणि स्वतंत्र लढलेल्या घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत.
दरम्यान, यात बहुजन विकास आघाडी, मनसे आणि प्रहार जनशक्ती यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. या लहान पक्षांच्या नेत्यांशी महायुतीचा संपर्क सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.