महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर! ‘लवकर या, लवकर जा…’ विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला. विधिमंडळातही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला दिनानिमित्त निवेदन सादर केले.

विधानपरिषदेत बोलताना राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली, गो अर्ली” ही नवी कामकाज पद्धती लागू करण्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेबाबत थोडी लवचिकता मिळणार आहे. या योजनेनुसार, महिला कर्मचारी जर सकाळी 9.15 वाजता कार्यालयात हजर झाल्या, तर त्यांना संध्याकाळी अर्धा तास लवकर घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. काम आणि कुटुंब यांचा समतोल राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

विधानपरिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, महिला दिनानिमित्त सभागृहात अनेक सदस्यांनी महिलांच्या प्रश्नांवर मते मांडली. काही विधायक सूचना देखील पुढे आल्या. महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक अनुकूल वातावरण मिळावे आणि त्यांचा ताण कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय राज्य सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरू केल्याचेही त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण, लेक लाडकी आणि अन्नपूर्णा यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच ऑनलाइन व्यवहारांमधून होणारी फसवणूक रोखण्यासाठीही कायद्याच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.