कोल्हापूर-पुणे प्रवास होणार सुसाट! जूननंतर प्रवास केवळ तीन तासांत होणार शक्य, सरकारचा भन्नाट प्लॅन तयार..

पुणे : कोल्हापूर ते पुणे दरम्यानचा प्रवास लवकरच अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून जून 2026 पर्यंत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या साडेचार तासांपर्यंत लागणारा प्रवास वेळ कमी होऊन अवघ्या तीन तासांत हा मार्ग पार करता येणार आहे.

रस्त्याचे चौपदरीकरण, उड्डाणपुल, भुयारी मार्ग आणि ब्लॅक स्पॉटवरील सुधारणा करण्यात येत आहेत. जून 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण होणार असून प्रवासाचा वेळ सध्या 4–4.5 तासांवरून तीन तासांवर येईल.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर पेठ नाका, पेठ नाका-सातारा आणि सातारा-पुणे या तिन्ही टप्प्यांवरील कामे वेगाने सुरू आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली चौपदरीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सवरील सुधारणा केली जात आहे.

जून 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सध्याचा 4 ते 4.5 तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे. पुणे-सातारा या 140 किमी अंतराच्या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स यांना 2010 ते 2035 या कालावधीसाठी बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते.
मात्र काही कामे अपूर्ण राहिल्याने एनएचआयने ठेका रद्द करून उर्वरित काम स्वतः हाती घेतले. खेड शिवापूर, शिवरे, हरिश्चंद्री आणि वेळे येथील ब्लॅक स्पॉट दुरुस्ती पूर्णत्वाकडे आहे. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम पूर्ण झाले असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे.
पेठ नाका ते कराड या 27 किमी मार्गाचे काम 2022 मध्ये अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चर्स यांना दोन वर्षांसाठी देण्यात आले होते. काही कारणांमुळे सुमारे 15 महिने काम रखडले; मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भुयारी मार्गास मान्यता देत प्रकल्पाला गती दिली. कराड येथील उड्डाणपूल जूनपर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
पेठ नाका ते कोल्हापूर या 45 किमी रस्त्याचे काम रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड करत आहे. ठेकेदाराच्या संथ गतीमुळे विलंब झाला होता, परंतु जानेवारी 2026 पासून कामाचा वेग वाढवण्यात आला.