शिर्डीत वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करून खून, सात अल्पवयीन मुलांना अटक, घटनेने खळबळ..

शिर्डी : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
वाढदिवस साजरा करण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून लुटल्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शिर्डीतून समोर आली आहे. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
गणेश सखाहरी चत्तर (वय.४२, रा. हांडेवाडी, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ८ जूनपासून बेपत्ता होते. १३ जून रोजी नांदुर्खी बुद्रुक शिवारातील बाळासाहेब कोते यांच्या ऊसाच्या शेतात एक अनोळखी मृतदेह आढळला. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय तपासणीत धारदार शस्त्राच्या वारामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस तपासादरम्यान मृताच्या खिशातील मोबाइल फोन सात अल्पवयीन मुलांनी चोरून स्थानिक दुकानदाराला सुमारे साडेचार हजार रुपयांना विकल्याचे समोर आले. त्या पैशातून त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. यातील एका मुलाने दुकानदाराकडून चोरीचा मोबाईल विकत घेऊन वापरायला चालू केल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागला.
तपासात उघड झाल्यानुसार, गणेश चत्तर हे पायी जात असताना या अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना ऊसाच्या शेतात नेऊन, ऊसाच्या कांडक्याने व हाताने मारहाण केली. यातील एकाने गळा दाबून खून केला तर दोन जणांनी चाकूने हल्ला केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात टाकण्यात आला व त्यांच्याजवळील मोबाइल विकण्यात आला. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, या घटनेतील काही मुलं नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती असून, त्यांच्याकडून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिर्डी व राहाता परिसरात अल्पवयीन मुलांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असून, याआधीही अशाच स्वरूपाच्या हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिर्डी परिसरात नशेखोरी आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.