करणवीर मेहराने पटकावली ‘बिग बॉस १८ची’ ट्रॉफी, मिळाले तब्बल इतके लाख रुपये..

मुंबई : ‘बिग बॉस १८चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून करणवीर मेहराने विजेतेपद पटकावलं आहे. १०५ दिवसांच्या खेळानंतर अखेर या सिझनचा विजेता सूत्रसंचालक सलमान खानने जाहीर केला.

यंदाच्या सिझनमध्ये २३ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे स्पर्धक टॉप ६ पर्यंत पोहोचले होते.
अंतिम लढत विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये होती. तर फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल या शोमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला. करणला ५० लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळाली आहे.

शेवटच्या दहा मिनिटांमध्ये करणवीर आणि विवियनसाठी लाइव्ह वोटिंग सुरू करण्यात आली होती. त्यात करणवीरने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे त्याने याआधी ‘खतरों के खिलाडी’ या शोचंही विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून करणची खेळी विशेष चर्चेत होती. एकीकडे अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांनी मैत्रीपेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिलं. तर दुसरीकडे करणवीर हा शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांगसोबतच्या मैत्रीत प्रामाणिक राहिला.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा अव्वल ठरण्यासाठी त्याने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलं नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. यामुळेच त्याला प्रेक्षकांकडून खंबीर पाठिंबा मिळत गेला. करणवीरचा प्रामाणिक आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला.