जयंत पाटलांनी आपला राजकीय वारसदार निवडला, मुलाला केले कारखान्याचे अध्यक्ष…!

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपला मुलगा आता राजकारणात उतरवला आहे. लोकनेते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

प्रतीक यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडीने जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार हे प्रतीक हेच असणार हे निश्चित झाले होते. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तसेच या कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजयराव बळवंत पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. निवडीनंतर युवा कार्यकर्त्यांनी हालगी-घुमके आणि डीजेचा ठेका, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जोरदार आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, जयंत पाटील यांनी दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे वडिलांनंतर मुलगाही कारखान्याचा कारभार बघणार आहे.
प्रतीक यांचे आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये हा कारखाना सुरू केला. तेव्हापासून कारखाण्यावर पाटील घराणे लक्ष घालत आहे.