इराण -इस्रायल युद्धाचा औद्योगिक क्षेत्रांना फटका ; हजारो कंपन्याना टाळेबंदी, कामगारांवर उपासमारी?

पुणे : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धाची झळ आता महाराष्ट्रासह भारतातील उद्योगाना बसली आहे.व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा झाला नाही तर हजारो उद्योग बंद पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धामुळे कंपन्यांना टाळेबंदी लागली तर अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्रांना बसला आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत याचे पडसाद उमटत आहेत.या औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्याने सुमारे 30 टक्के कंपन्याचे कामकाज ठप्प झाले असून उर्वरित 70 टक्के कंपन्याचे ऑनलाईन गॅस असल्याने सध्या तरी कामकाज सुरळीत सुरू आहे.
इराण – इस्त्राईलच्या या युद्धामुळे गॅसचा पुरवठा आणि वाहतूक साखळी विस्कळीत होत असल्याने काही उद्योगांना उत्पादन नियोजनात अडचणी येत आहेत. काही कंपन्यांना लागणाऱ्या पार्ट्स आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यात विलंब होत असल्याने उत्पादनावरही परिणाम जाणवत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे.

दुसरीकडे, या परिस्थितीचा परिणाम कंपन्यांमधील कॅन्टीन सेवांवरही होत असल्याचे दिसत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने कॅन्टीन चालवणाऱ्या ठेकेदारांवर खर्चाचा ताण वाढला आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांची संख्या मोठी असल्याने कॅन्टीन सेवा ही महत्त्वाची सुविधा मानली जाते. मात्र गॅस उपलब्ध होत नसल्याने कॅन्टीन चालक आणि कंपन्या दोघांनाही आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.