उसाच्या शेतीमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवा, पुण्यातील कार्यशाळेत अजित पवार यांचे आवाहन..

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ॲग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित “ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावरील चर्चासत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यानिमित्तानं कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित माहिती पुस्तिकेचं (कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती) विमोचन शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. २०२३-२४ मध्ये आपल्याकडे देशात ५७ लाख ४० हजार हेक्टर हे उसाचं क्षेत्र लागवडीचं होतं आणि २०२४–२५ मध्ये ते ५३ लाख ५८ हजार हेक्टरपर्यंत खाली घसरलं. म्हणजे ६.६५ % हे क्षेत्र घसरलेलं आहे.
देशामध्ये २०२३-२४ ला ३१५८ लाख मेट्रिक टन क्रशिंग झालं आणि २०२४–२५ मध्ये २८०८ मेट्रिक टन क्रशिंग झालं. म्हणजे देशात २०२३-२४ च्या तुलनेत क्रशिंगमध्ये ११% ची घट झालेली आहे. याचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. साखर कारखानदारीला, ऊस उत्पादक शेतकऱ्याला बसलेला आहे .
रिकव्हरीच्या बाबतीत २०२३-२४ मध्ये देशाची रिकव्हरी ही १०.१० होती. आर्थिक समस्यांचा विचार करता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला पाहिजे. नवीन आव्हानं आपण स्वीकारली पाहिजे. कारखानदारी तर टिकली पाहिजे, पिढ्यानं-पिढ्या माझ्या ऊस उत्पादन शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. शेतकरी बांधवांना, सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखान्यांना जी मदत करता येईल, ती मदत आमच्याकडून केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.
AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवूया. आपल्या राज्यातली सहकारी साखर कारखानदारी टिकण्याकरता, शेतकरी बांधवांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरता खाजगी किंवा सहकारी साखर कारखान्यांनी AI चा वापर करण्यास सुरुवात करावी, असं आवाहन अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या निमित्तानं केले.