स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील शेवटच्या दृष्याबाबत माझ्यावर दबाव होता!! अमोल कोल्हे यांचा खळबळजनक आरोप…

पुणे : स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. मात्र, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत हे दृश्य दाखवण्यात आले नव्हते. यावर त्यांनी खुलासा केला आहे.

यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना अमोल कोल्हेंनी सांगितले की, मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे दृश्य न दाखवण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता. माध्यमांकडूनही हा दबाव येत होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.
या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हेंनी मालिकेच्या अंतिम भागाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे याबाबत सविस्तर माहिती देखील ते देणार आहेत. अमोल कोल्हे म्हणाले, “टेलिव्हिजनवर मालिका दाखवताना काही नियम आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

त्या नियमांमुळेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दाखवू नये, असा दबाव होता. दुसरीकडे नैतिकतेचाही प्रश्न होता. सलग 40 दिवस मालिकेतून महाराजांचे बलिदान दाखवणे म्हणजे प्रत्येक घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा मानसिक त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
यामुळे हे लक्षात घेऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन निर्णय घेतला तरी आमच्यावर टीका झाली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दाखवल्याने तुम्हाला कोणता आनंद मिळाला असता, असा प्रश्न मी माझ्यावर टीका करणाऱ्यांना विचारतो. मला अशा लोकांची कीव येते, असेही त्यांनी म्हटले आहे.