56 वर्षांपासून काम करतोय, एका दिवसात तुमचा प्रश्न सोडवू!! शरद पवारांचा आझाद मैदानावर एल्गार..

मुंबई : सध्या राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा निर्धार सर्वानी केला आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ, असं म्हटले.

शरद म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून न्याय मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्रातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मान देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनानी घेतली पाहिजे. मला रोहित पवारांकडून समजलं, इथं एक राज्यातील मंत्री येत आहेत. मला वाटलं की हे मंत्री येत आहेत तर चर्चा करून प्रश्न सोडवतील.
पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. राज्य सरकारला स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांनी उद्याची पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी अंतकरणापासून स्वीकारली आहे, त्यांच्यावर संघर्षाची वेळ येता कामा नये. शिक्षकांची जी मागणी आहे त्यासाठी लवकरात लवकर पैशाची तरतूद करा.

तुमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाईल. अपेक्षा आहे की आज-उद्या तुमच्या मागण्या मान्य होऊन तशी तरतूद सरकारकडून केली जाईल. आज-उद्या मी एवढ्यासाठी म्हटलं की आज बैठक आहे. आज निर्णय झाल्यानंतर जीआर काढायला अर्थखात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासन खात्याकडे जावं लागतं,
तुम्ही काही चिंता करू नका, प्रशासनातील मला थोडंफार समजतं,असे म्हणत त्यांनी थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच ते म्हणाले, महाराष्ट्राची विधानसभा, विधानपरिषद आणि देशाची लोकसभा, राज्यसभा यात मी गेली 56 वर्षे सतत कार्यरत आहे. त्यामुळे प्रशासनाबाबत तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते, असेही ते म्हणाले.