उरुळी कांचन शहरात बलात्काराचा निषेध म्हणून प्रचंड मूक मोर्चा! शहरात पोलिस बंदोबस्त तैणात, ग्रामस्थांनी कडक कारवाईची केली मागणी….!!

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधम भावांनी शस्त्राचा धाक दाखवून वेळोवेळी पाशवी स्वरुपाचा बलात्कार केल्याने या घटनेने उरुळी कांचन शहरात ग्रामस्थांचा प्रचंड संताप उडाला असून घटनेचा निषेध व आरोपीं वर कडक स्वरुपाची कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी सायंकाळी ६ नंतर शहरातून प्रचंड मोठा मूक मोर्चा काढला आहे. निवेदन देऊन ग्रामस्थांनी घटनेचा निषेध म्हणून उरुळी कांचन शहर हे शनिवार (दि.१५) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेने ग्रामस्थांत प्रचंड संतापाची भावना असून संतापजन्य स्थितीत शहरात शांतता आहे.
उरुळी कांचन शहरात एका अल्पवयीन मुलीवर आई- वडीलांचा खून करण्याची भिती दाखवून शस्त्राने धमकावून पंधरा दिवसांत दोघा भावांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर होऊन ग्रामस्थांनी घटनेचा निषेध म्हणून सायंकाळी ६ च्या नंतर शहरातून मूक मोर्चा काढला. गाढीतळ मार्गे, महात्मा गांधी रस्ता, बाजारपेठ व आश्रम रस्त्या मार्गे हा मोर्चा उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्रावर धडकला.
यावेळी मूक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भातपोलिस दूरक्षेत्रात येऊन आक्रमक मागणी करुन पोलिसांना निवेदन देऊ केले. यावेळी ग्रामस्थांनी बलात्काराच्या आरोपात अटक केलेला दोघा आरोपींना पोक्सो अंतर्गत कारवाई करुन आरोपींना शिक्षेपर्यंत कारवाईची प्रक्रिया करावी अशी आक्रमक मागणी मोर्चेकरांनी व्यक्त केली. यावेळी घटनेचा निषेध म्हणून शहर शनिवार दि१५ रोजी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी पोलिस प्रशासन यांच्यापुढे घेतला आहे.
ग्रामस्थांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी काढलेल्या मूक मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणीकाळभोर चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे हे उपस्थित होते.
दरम्यान उरुळीकांचन शहरात संतापाचा उद्रेक पाहता पोलिस शहरात मोठा बंदोबस्त तैणात केला आहे. पोलिसांची शहरात सर्वत्र गस्त सुरू आहे. शहरात घटनेचा मोठा संताप असला तरी ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढून संयमाची भूमिका घेतली आहे.
यापूर्वी दाखल गुह्यांची पोलिस कारवाई तपासावी..!
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींवर यापुर्वी शहरात सोशल मिडीयात महापुरुषां बद्दल अक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध करुन अवमान केल्याबद्दल पोलिस कारवाई झाल्याचे पुढे आले आहे.
मात्र या कारवाईत आरोपींनी समाज भडकेल असे गंभीर स्वरुपाचे कृत्य करुनही पोलिसांनी आरोपींवर हमी पत्र घेऊन जुजबी प्रकारचे गुन्हे दाखल केल्याचा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर गुन्हात कशा प्रकारची कारवाई केली आहे ? या कारवाईची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे