मुंबईत हायव्होल्टेज लढत ; ‘या ‘कारणामुळे मनपाचा निकाल लांबणार; महत्वाची माहिती समोर..

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उद्या (15, जानेवारी )मतदान होणार आहे.अशातच सर्व राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई पालिकेच्या मतमोजणीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांप्रमाणे यावेळी शहरातील सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार नाही. यंदा मतमोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याने मनपाचा निकाल लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी अधिकारी असून, प्रत्येक अधिकारी साधारण दहा प्रभागांची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, एकावेळी केवळ दोन प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम होणार आहे. ही मतमोजणी दोन टप्प्यात केली जाणार आहे.शुक्रवारी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत यावेळी महापालिका निकालांना वेळ लागणार आहे.
दरम्यान एका वेळी दोनच प्रभागांची मतमोजणी होणार असल्यानं निकाल उशीर होण्याची शक्यता आहे, २२७ वॉर्डांची २३ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. एका केंद्रावर एका वेळी दोनच वॉर्डांची मतमोजणी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका टप्प्यात ४६ याप्रमाणे पाच टप्प्यांत २२७ वॉर्डांची मतमोजणी पार पडणार आहे. एका मतमोजणी केंद्रावर जवळपास १० वॉर्डांची मतमोजणी होणार आहे.

हाय व्होल्टेज लढत असलेल्या मुंबई महानगरपालिकडे सर्वांचे लक्ष लागले असताना निकालाची उत्सुकता ही शिगेला पोहोचणार आहे. मात्र हा निकाल लांबणीवर पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.