महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी…

पुणे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान वरुणराजा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी हजेरी लावताना दिसून येत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्याला तर पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.

आज मुंबईत वातावरण तुलनेने स्थिर असले तरी ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. जोरदार पावसाची नोंद नसल्याने शहरात पाणी साचलेले नाही आणि वाहतूकही सुरळीत सुरू आहे. आज दिवसभरात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहील.

वाऱ्याचा वेग साधारण १० ते १५ किमी प्रतितास असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे आणि नवी मुंबई भागात हलक्या सरी सुरू असून दुपारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या भागासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट घोषित केला आहे, येथे किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.
पालघर जिल्ह्यात ठाण्यापेक्षा थोडा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असून वाऱ्याचा वेग २० किमी प्रतितासपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांत आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी आधीच मुसळधार सरींचा अनुभव आला आहे आणि दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढू शकते.