शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी! मान्सून केरळात दाखल, आठ दिवस आधीच जोरदार एन्ट्री, हवामान विभागाची अधिकृत घोषणा..

पुणे : मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.

आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता.
यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात सक्रिय होतो. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने झोडपून काढले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाऊस पडला तरच सर्व गोष्टी होतात. व्यापार, व्यवसाय देखील पावसावरच अवलंबून आहे. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.
येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र व त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रात तसेच कोकण-गोवा आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ व किनारपट्टीवर 24 ते 25 मे दरम्यान ताशी 45-55 किमी ते ताशी 65 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नैऋत्य माेसमी पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे. येणाऱ्या काळात पावसाची परिस्थिती कशी राहील हे देखील लवकरच समजेल. याबाबत हवामान विभाग माहिती देत आहे.