सरकारने पायी चालणाऱ्यांकडून आणि मार्गावरून उडणाऱ्या पक्षांकडूनही टोल घ्यावा, दुचाकी टोलच्या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक….

पुणे : १५ जुलै पासून दुचाकी वाहनांना देखील टोल लागू करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. असं असेल तर सरकारने आता पायी चालणाऱ्यांकडून देखील टोल घ्यायला हवा, किंबहुना या मार्गावरून उडणाऱ्या पक्षांनाही टोलच्या कक्षेत कसं आणता येईल यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी, जेणेकरून शासकीय तिजोरी वेगाने भरेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
याबाबत माहिती अशी की, आतापर्यंत केवळ चारचाकी किंवा त्याहून मोठ्या वाहनांवर टोल लागायचा, पण आता दुचाकींनाही टोलच्या रांगेत उभं राहावं लागणार आहे. सरकारचा हा नवा नियम १५ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य वाहनचालकांवर होणार आहे.
आजवर जेव्हा दुचाकीवरून आपण टोल प्लाझावरून जातो, तेव्हा थांबावं लागत नाही, कारण टोल भरावा लागत नसे. परंतु आता हे बदलणार आहे. नव्या नियमानुसार दुचाकी वाहनांनाही FASTag लावणं बंधनकारक असेल आणि त्याद्वारे टोल भरावा लागेल.
जर कुणी नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याला तब्बल २,००० रुपये दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांना यापुढे मोठा त्रास होणार आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात जवळपास १,०५७ टोल नाके कार्यरत आहेत.
या टोल नाक्यांमधून लाखोंच्या संख्येने वाहनं दररोज प्रवास करतात. यापैकी आंध्र प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ७८ टोल प्लाझा आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये १२३ टोल आहेत. त्यामुळे या नव्या नियमाचा परिणाम देशभरातील लाखो दुचाकीस्वारांवर होणार आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांनी यावर जोरदार टीका केली.