लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या 5 लाख महिलांकडून सरकार पैसे परत घेणार? आदिती तटकरेंनी स्पष्ठच सांगितलं….

मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल ५ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

यामुळे या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सध्या विरोधक राज्य शासनावर जोरदार टीका करत आहेत. सध्या ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणं सुरूच राहणार आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी एक ट्वीट देखील केले आहे. यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. दिनांक २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे.

तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या महिलांची आकडेवारी आणि कारणेही जाहीर केली. एकूण ५ लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आले आहे. अनेक महिला दोन योजनांचा लाभ घेत होत्या, तर काहींच्या कुटुंबांकडे चारचाकी गाड्या होत्या. त्यामुळे, नियमांनुसार या महिला योजनेसाठी अपात्र ठरत होत्या.
यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आता पडताळणीत अपात्र आढळलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.