मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! MSRDC ने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या..

पुणे : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचे दहा पदरी सुपर हायवे मध्ये रूपांतर करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे पुढील काही वर्षात प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणारा असून वाहतूक कोंडीवरील नियंत्रण मिळवले जाईल. पूर्वी एक्सप्रेस वे आठ पदरी करण्याची योजना होती परंतु वाढत्या वाहतुकीचा विचार करून आता दहा पदरी सुपर हायवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विस्तारासाठी एकूण अंदाजीत खर्च १४२६० कोटी रुपये इतका आहे हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीतून राबवला जाणार असून यासाठी हायब्रीड अँन्यूइटी मॉडेल अवलंब करण्यात येणार आहे.

या मॉडेल नुसार सरकार एकूण खर्चाच्या ४०% रक्कम देईल तर खाजगी कंपन्या उर्वरित ६० टक्के गुंतवणूक करतील यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील नियोजन शक्ती आणि खाजगी क्षेत्रातील कार्यक्षमता एकत्र येईल.
दरम्यान, एम एस आर डी सी च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि ते २०२९ ते ३० पर्यंत पूर्ण होईल यासाठी विस्तृत तांत्रिक नियोजन आणि वाहतूक विश्लेषण सुरू आहे प्रकल्पाला दिवाळीनंतर अंतिम मंजुरी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हा ९४.६ किमी लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. २००२ साली सुरू झालेल्या या मार्गाने कळंबोली ते किवळे असा प्रवास सुलभ केला तर सुमारे ६५ हजार वाहने तर आठवड्याच्या शेवटी एक लाखाहून अधिक वाहने या मार्गावरून प्रवास करतात.
दरवर्षी या मार्गावरील वाहतुकीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ होत आहे सध्या १३ किमी लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असून त्यात खंडाळा घाटातील दहा पदरी भागाचा समावेश आहे. नवीन प्रस्तावात उर्वरित भागाचे विस्तारीकरण करण्यात येईल.