शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ मुलांना महिन्याला मिळणार २२५० रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि दैनंदिन गरजांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही राज्यातील गरजू मुलांसाठी दिली जाणारी एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे.

समाजातील सर्वात कमजोर घटकांतील मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षणाचे संरक्षण आणि आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. या योजनेचा लाभ एकल महिलांची मुले, पालक गमावलेली मुले, अनाथ, निराश्रित, बेघर तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त मुलांना मिळतो.

राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा निकष पूर्णतः रद्द करण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक मुलांना या योजनेतून मोठा फायदा होणार आहे.

शासनाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत २ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुलांना दरमहा २२५० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षण, पोषण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी होतो. कोरोना काळात पालक गमावलेल्या मुलांना या योजनेतून विशेष मदत देण्यात आली असून, त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये यावर शासनाचा भर आहे.
या योजनेची मोठी खासियत म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना सुद्धा हा लाभ मिळू शकतो. १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे मुलांच्या मूलभूत गरजांवरती त्वरित मदत पोहोचते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि अंगणवाडी सेविकेसह काढलेले छायाचित्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या यंत्रणेद्वारेच राबवली जाते.
शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापक पात्र विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून प्रस्ताव जिल्हा बालकल्याण समितीकडे पाठवतात. सुनावणी आणि डॉक्युमेंट पडताळणीनंतर प्रस्ताव मान्य झाल्यावर महिला व बालविकास विभाग ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करतो. पंचायत समितीचे अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्था पालकांना सातत्याने मार्गदर्शन करतात.
