आयटीयन्ससाठी गूड न्यूज! पुणे-मुंबई प्रवासात एक तास वाचणार, आता हिंजवडी-मुंबई एसटी बससेवा सुरु होणार..

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीहून थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडे विचाराधीन आहे.

हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास प्रवाशांचा वेळ, पैसा आणि दैनंदिन प्रवासातील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मेट्रो लाइन तीन (हिंजवडी–शिवाजीनगर) येत्या मार्चअखेर सुरू होण्याची शक्यता असल्याने या प्रस्तावाला अधिक बळ मिळाले आहे.
सध्या पुणे-मुंबई मार्गावरील बहुतांश एसटी बसेस स्वारगेट किंवा पुणे स्टेशन येथून सुटतात. मात्र वाकड चौकापासून स्वारगेटपर्यंतच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना दीड ते दोन तासांचा अतिरिक्त वेळ लागतो.

दरम्यान, एक्स्प्रेस-वे मोकळा असतानाही शहरातील वाहतूक कोंडीमुळे ई-शिवनेरी, ई-शिवाईसारख्या प्रीमियम बसेसही अडकतात. यामुळे वेळेची मोठी नासाडी होते, तसेच प्रवाशांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो. ही अडचण लक्षात घेऊन विविध प्रवासी संघटनांनी हिंजवडीहून थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे. हिंजवडी हे आयटी कंपन्यांचे प्रमुख केंद्र असल्याने दररोज हजारो कर्मचारी, उद्योजक आणि प्रवासी येथे ये-जा करतात. येथे स्वतंत्र एसटी स्थानक सुरू झाल्यास किमान एक तासाचा प्रवास वेळ वाचणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
मेट्रो लाइन तीनमुळे हिंजवडी ते शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय अशी थेट जोडणी मिळणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड, स्वारगेट, रामवाडी यांसह संपूर्ण पुणे शहर मेट्रोच्या जाळ्यात येईल. प्रवासी मेट्रोने थेट हिंजवडीतील प्रस्तावित एसटी स्थानकापर्यंत पोहोचून पुढील प्रवास मुंबईकडे सहज करू शकतील.
