सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! होणार मोठा फायदा, जाणून घ्या..

मुंबई : राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली असून, आता कर्मचाऱ्यांना ५०% ऐवजी ५३% महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, फेब्रुवारी महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना अशा अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरकारवर होत होता.
दरम्यान, महागाई भत्त्यातील वाढीचा प्रश्न सुटल्याने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार घरभाडे भत्त्यातही वाढ झाली आहे. ही वाढ मिळाली नसल्याने राज्यभरातील कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये नाराजी होती. ७ व्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार, १ जुलै २०२४ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर आधारित महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला आहे.