आनंदाची बातमी! ‘या’ ग्राहकांना वीज बिलात १०% सूट, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय….


पुणे : राज्यात स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या ३८ लाख ग्राहकांना सौर तासांतील वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

तसेच राज्यात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेदरम्यान सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲड. अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी स्मार्ट मीटर संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर कार्यरत आहेत आणि यामुळे वीजवापराचे अचूक आणि पारदर्शक मोजमाप शक्य झाले आहे.

फडणवीस यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मिळाला आहे. राज्यातील विजेचे दर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आधीच कमी असून, स्मार्ट मीटर बसविणे ही सक्ती नसून पर्यायी सुविधा आहे.

प्रत्येक युनिटचे कॅलक्युलेशन हे ऑटोमॅटिक होत असल्यामुळे बिल वाढण्याची शंका निराधार आहे. या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून चार खाजगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांच्या वापराचे रिअल टाइम मोजमाप शक्य होत असून, त्यांना बिल तपशील अधिक स्पष्ट आणि पारदर्शक स्वरूपात मिळतो.

दरम्यान, कोळीवाडे आणि वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांनाही वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योजना तयार केली जाणार आहे. ती योजना लवकरच न्यायालयासमोर सादर केली जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!