उरुळीकांचन करांनी अनुभवले भक्तिचे रुप! कडक उन्हातही संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पाऊले पंढरीकडे..!!

उरुळी कांचन : जयदीप जाधव
! धन्य आजि पंथे चालती पाऊले !
!! टाळिया शोभले कर दोन्ही !!
! धन्य तुका म्हणे आम्हांसी फावले !
!! पावलो पाऊले विठोबाची !!
तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, हरीचे नाम घेऊन माझे दोन्ही कर टाळ्या वाजवीत आहेत , आज आम्ही विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन आहोत, त्यामुळे आमचे जीवन धन्य झाले आहे. हाच प्रत्यय पंढरीच्या वाटेवर चाललेल्या लाखोंच्या वैष्णवांत अनुभवून विठ्ठल भेटीने तहान -भूक हरविलेल्या लाखों वैष्णवांच्या भक्तिचे रुप उरुळी कांचनकरांना अनुभविता आले.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरचा मुक्काम उरकून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन नगरीत दाखल झाला. तीव्र उन्हाची पर्वा न करता भक्तीरसात गुंतलेल्या या वैष्णवांनी पांडुरंग चरणी आपल्या भक्तीचा दाखला देत वातावरण हर्षोउल्लाहीत केले.
उरुळीकांचन हद्दीत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी सरपंच राजेंद्र कांचन, उपसरपंच अनिता तुपे,माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन ,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य संतोष कांचन, मा.सरपंच संतोष कांचन ,ग्रा.प.सदस्य अमित कांचन, युवा नेते अजिंक्य कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पालखी सोहळा आश्रम रस्त्यामार्गे गावात मारुती मंदिरात दाखल झाला. यावेळी भैरवनाथ सेवा समिती व भैरवनाथ सेवा ट्रस्ट वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यातआले. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत पादुकांची आरती पार पडली. त्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यास महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर विसावला.विसाव्यात टाळ -मृदूंगाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते.
फुगड्या, पायघड्या, भारुड गायन आदी खेळांत वारकरी दंग झाले होते. यावेळी भैरवनाथ सेवा समितीच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी हजारो नागरीकांनी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी विसावास्थळी गर्दी केली होती. प्रशासनाच्या वतीने हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे , अप्पर पोलिस आयुक्त रंजन शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्वीनी राख, लोणीकाळभोरचे वरिष्ठ निरीक्षण दत्तात्रय चव्हाण हे उपस्थित होते.
साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुपारचा विसावा उरकून पालखी सोहळा यवत मुक्कामासाठी महात्मा गांधी रस्त्यामार्गे मार्गस्थ झाला. साधारण सायं. ४ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा हवेली तालुक्याची शिव ओलांडून बोरी भडक (ता.दौंड ) येथील वेशीवर दाखल झाला. रणरणत्या उन्हात ‘पांडुरंग’ नामस्मरणाचे एकच वाक्य भक्तिसागराला तल्लीन करीत असल्याचे मोहक रुप पदोपदी अनुभवायला मिळत होते.
दरम्यान तत्पूर्वी सकाळी थेऊर फाटा , कुंजीरवाडी येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे सदस्य तात्यासाहेब काळे यांनीही पालखीचे स्वागत केले.
तर कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अंजली गायकवाड, उपसरपंच अजय कुंजीर, माजी सरपंच संतोष कुंजीर, संग्राम कोतवाल ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी पालखीचे स्वागत केले.पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तानाजी चौधरी यांनी सोरतापवाडीत सरपंच संध्या चौधरी, उपसरपंच रवींद्र गायकवाड तर कोरेगावमूळ येथे प्रभारी सरपंच वैशाली सावंत यांनी स्वागत केले .
कस्तुरी प्रतिष्ठानच्या ‘बेताने’ वारकरी प्रफुल्लित…!
समाजसेवा व सामाजिक कार्याची मोठी ओढ असलेल्या उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी यंदाही खास चविष्ठ अन्नदानाचा बेत ठेवला होता. यंदा प्रतिष्ठानने वारकऱ्यांच्या सेवेसाठी शुद्ध ऊसाचा रस उपलब्ध केला होता. उन्हामुळे लाहीलाही झालेल्या वारकऱ्यांसाठी हा उसाचा रस आधार देत होता. उसाच्या रसासहीत पिठलं भाकर, भाजी , शिरा तसेच आदी स्वादिष्ट भोजनाने वारकरी मंत्रमुग्ध होत होते