महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; माजी उपसरपंचाचा भोवळ येऊन मृत्यू

पुणे : गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या इराण -इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्राला देखील बसल्या आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले असताना आता अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे असलेल्या माजी सरपंचाचा भोवळ येऊन मृत्यू झाला आहे.त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आखाती देशातील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. गॅस सिलेंडर साठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. उन्हाचा पारा चांगला चढला असताना दुसरीकडे गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे राहावे लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या माजी सरपंचांच्या मृत्यूने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच असलेले शंकरराव सिरसाट यांचा शनिवारी (दि. २८) दुपारी मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी कोणाच्या वाढत्या तडाख्याने त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पसरवणारी अफवा, वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. १४ किलोच्या सिलिंडरऐवजी कमी प्रमाणात गॅस मिळत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या सर्व परिस्थितीत सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.