शेतकरी सुखावला! जून महिन्यातच नीरा खोऱ्यातील चारही धरणांत पाण्याची मोठी आवक, वीर धरण लवकरच ओव्हरफ्लो..

वीर : यंदा पावसाला नेहेमीपेक्षा आधीच सुरुवात झाली आहे. सध्या नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. धरण क्षेत्रातील सर्व चारही धरणांत मोठा विसर्ग सुरू असून, मोठा पाणीसाठा जमा होत आहे. यामुळे जून महिन्यातच ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
याबाबत निरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी माहिती दिली की, वीर धरण ८७ टक्के भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून २२ जूनपासून वीर धरणातून निरा नदीत दुपारी १२ वा. ६७३७ क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गतवर्षी २२ जून २०२४ रोजी या चार धरणांतील सरासरी एकूण पाणीसाठा ४:८८ टीएमसी व सरासरी टक्केवारी १०:५६ टक्के होती.
आता याच चार धरणांतील सरासरी एकूण पाणीसाठा १७.३६ टीएमसी व सरासरी टक्केवारी ३५.९ टक्के एवढी आहे. वीर धरणातून नीरा उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पालख्या कालवा क्षेत्रात पोहोचत आहेत. यामुळे पाणी सोडले जात असून यंदा पुराचा धोका देखील वाढला आहे. तिकडे उजनी धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान, २२ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता वीर धरणातून ६,७३७ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीही माहिती देण्यात आली आहे. सध्या या क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.