बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशूबाजाराबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकं बैठकीत काय घडलं?


मुंबई : राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात बकरी ईद आधी ३ ते ७ जून दरम्यान पशू बाजार बंद करण्याचा आदेश दिला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

कुठलाही पशू बाजार बंद राहणार नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ ते ८ जूनदरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जनावरांची बाजारपेठा भरवू नये, असा सल्ला देणाऱ्या महाराष्ट्र गौसेवा आयोगावर जोरदार टीका झाली. त्यानंतर आयोगाने आपला ७ मे रोजीचा सल्ला मंगळवारी मागे घेतला. आता केवळ गाय आणि तिच्या वंशाच्या खरेदी-विक्रीवर बंदी राहणार आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी २जून रोजी सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत गृहविभागासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ ते ७ जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली.

त्यानंतर, या निर्णयावर विविध स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर महाराष्ट्र गौसेवा आयोगाने आपला ७ मे रोजीचा सल्ला ३ जून रोजी मागे घेत नवा सल्ला जारी केला. आता केवळ गाय आणि तिच्या वंशाच्या खरेदी-विक्रीवर बंदी राहणार असून, इतर सर्व प्रकारचे पशू बाजार पूर्ववत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंदीचा निर्णय मागे घेतल्याने शेतकरी, व्यापारी आणि धार्मिक संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “गौसेवा आयोगाला असा आदेश देण्याचा अधिकारच नाही. त्यांचे काम केवळ शिफारस करण्यापुरते मर्यादित आहे. आता अधिकृतपणे जनावरांची बाजारपेठ भरवण्यास परवानगी मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!