लग्नानंतर प्रदिर्घकाळ सुरू असणारे संबंध हे सहमतीचेच…!


चंदिगढ : एखाद्या पुरुषाचा दुस-या महिलेशी विवाह झाल्यानंतरही त्याने परस्त्रीशी लैंगिक संबंध ठेवले तर ते बळजबरीने संबंध प्रस्थापित केल्याच्या श्रेणीत टाकता येत नाहीत. प्रदिर्घकाळ सुरू असणा-या हे संबंध सहमतीचेच संबंध मानले जातील, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिली आहे.

न्यायालयाने या प्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप करणा-या एका महिलेची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर व न्यायमूर्ती कुलदीप तिवारी यांचे खंडपीठ म्हणाले की, तक्रारकर्तीचे आरोपीसोबत अनेक वर्षांपर्यंत शारीरिक संबंध होते. लग्नापूर्वी व लग्नंतरही त्यांच्यात संबंध होते. त्यामुळे ते बळजबरीचे संबंध होते असे म्हणता येत नाही.

काय आहे प्रकरण?
या प्रकरणी एका महिलेने याचिका दाखल केली होती. तिने म्हटले होते की, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर लग्न झाल्यानंतरही आरोपीने लग्नाची ग्वाही देऊन तिच्यासोबतचे संबंध अव्याहत चालू ठेवले. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी महिला हायकोर्टात पोहोचली होती.

तक्रारकर्तीने स्वत: मान्य केली संबंधांची गोष्ट
या प्रकरणी हायकोर्ट म्हणाले की, याचिकाकर्तीने आपल्या याचिकेत स्वत:च २०१२ ते २०१८ पर्यंत आपले आरोपीशी शारीरिक संबंध असल्याचे मान्य केले आहे. सलग ६ वर्षे संबंध ठेवण्याला बळजबरीचे संबंध म्हणता येत नाही. याचिकाकर्ती सुशिक्षित आहे. त्यानंतरही आरोपीने तिच्याशी संबंध ठेवले, तर त्यांना जबरदस्तीचे संबंध कसे म्हणता येतील?

जींद जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला
या प्रकरणी महिलेने म्हटले होते की, आरोपीने तिचा गर्भपात केला. त्यावर कोर्टाने आरोपीने आणून दिलेली औषधी महिलेने स्वत:च घेतल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करत आरोपीची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाने याप्रकरणी जींदच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!