मोठी बातमी! महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जाहीर, शरद पवार, आठवले पुन्हा खासदार होणार?

मुंबई : राज्यातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

राज्यसभेच्या या जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. १६ मार्च रोजी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. यामध्ये कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार फौजिया खान, खासदार प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार रजनी पाटील (काँग्रेस), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. यातील किती लोक पुन्हा रिंगणात उतरणार हे अजून स्पष्ट केले नाही.
यामध्ये ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ६ मार्ज रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल. ९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या सात जागांसाठी मतदान होईल. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर आहे.

निवडून येण्यासाठी एका जागेसाठी ३७ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत भाजपचं पारडं जड मानलं जात आहे. संख्याबळानुसार राज्यसभेच्या सात जागांसाठई भाजपला चार जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला एका जागेवर यश मिळू शकते.
दरम्यान, शरद पवार, रामदास आठवले हे पुन्हा रिंगणात उतरणार का निवृत्ती घेणार हे लवकरच समजणार आहे. पार्थ पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र अजून काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.