अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात, नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…!

मुंबई : राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्यातचप्रमाणे काल (ता.०७) रात्री पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचंही बघायला मिळालं. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत
