फुले शाहू आंबेडकराच्या पुरोगामी विचाराने प्रेरीत असलेल्या जिल्ह्यात भयंकर वास्तव, अल्पवयीन गुन्हेगारी आणि अमली पदार्थ, पालकांना हादरवणारी माहिती आली समोर..

कोल्हापूर : जिल्ह्यात गांजा व अमली पदार्थाच्या नशाच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरूणाई गुंतू लागली आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात याकरिता जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार यांची माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा केली. पालकांच्या व कुटूंबाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. १८ ते ३० या वयोगटातील मुलांची संख्या यामध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्नाटक सीमाभाग तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये यांचे प्रमाण वाढू लागल्याने शाळा व कॅालेज परिसरात याचे पेव पसरले आहे.
जिल्ह्यांमध्ये गुंडागर्दी व भाईगिरी करणाऱ्या टोळ्या, जातीय व धर्मांद तेढ निर्माण करणाऱ्या मंडळींकडून या प्रवृत्तीस चालना दिली जात आहे. शाळा व कॅालेजमध्ये विशेषता शहरी भागात मुलांना यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवले जात आहे.
किरकोळ भांडणातून व गटबाजीमधून व भाईगिरीच्या वर्चस्वादातून एकत्रित येणारी तरूणाई हळूहळू गांजा व अमली पदार्थांच्या नशाच्या आहारी जावून गुन्हेगारीकडे वळू लागली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्यापध्तीने खून व मारामारीचे प्रकार पाहिल्यास १८ ते ३० वर्षातील तरूण यामध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येवू लागले आहे.
ज्या परिसरात तरूणांच्यामध्ये भाईगिरीसाठी वर्चस्वासाची लढाई सुरू झाली आहे त्याठिकाणी गांजा व अमली पदार्थ नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील निर्मनुष्य विशेषता डोंगरी भागातील ठिकाणी रात्र -दिवस गाजा व नशा होणा-या अंमली पदार्थाचे सेवन करण्यात येत आहे.
फुले शाहू आंबेडकराच्या पुरोगामी विचाराने प्रेरीत असलेल्या जिल्हयात यापध्दतीने भरकटत चाललेली तरूणाई हा चिंतेचा विषय झाला आहे. पोलिस प्रशासनाकडून या गोष्टीवर जरब बसविणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी तातडीने सर्व शाळा व महाविद्यालय परिसरात याबाबत पोलिस भरारी पथके नेमून कडक कारवाई करण्याची यावेळी मागणी केली.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, तरूण मंडळे यांच्या सर्वांच्या माध्यमातून तरूणाईमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करून उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुळे मुलांकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.