33 कोटींची डिस्टिलरी अन् त्यावर 100 कोटींचं कर्ज! मुख्यमंत्री होणारे कारखान्याला अर्ज भरू लागले, रंजन तावरे यांची अजित पवार यांच्यावर जोरदार टीका…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी सध्या प्रचार सुरू असून राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन काका तावरे एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. सध्या दोन्ही पार्टीकडून घोंगडी बैठका घेतल्या जात असून प्रचार सुरू आहे.

अशातच रंजन काका तावरे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आता सभासदांनी जागं व्हावं. माळेगावची छत्रपतीसारखी स्थिती करू देऊ नका. माळेगावची स्थिती बदलण्यासाठी आमच्या पॅनेलला निवडून द्या. आता चुकलो, तर काळ माफ करणार नाही. माळेगावमध्ये तुम्ही दोन वेळा इतिहास घडविला. त्यामुळे चंद्रराव तावरे यांनी सर्वाधिक भाव दिला.
आता मात्र मोठे संकट आहे. स्वतःची खाजगी कारखानदारी वाढवण्यासाठी व चांगला चाललेला सहकार मोडून काढण्यासाठी ते झटत आहेत, तुम्ही मात्र तुमचे भविष्य सुरक्षित ठेवा. तसेच अजित पवारांवर टीका करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री व्हायचं, ते माळेगावच्या निवडणुकीत अर्ज भरला. तावरे म्हणाले, सरासरी ११.७९ साखर उतारा असताना आम्ही राज्यातील सर्वोच्च दर दिला.

आता तोच कारखाना निचांकी स्तरावर नेला. आज ४२ वर्ष झाली, गेल्या ४० वर्ष कधीच आसवनीवर कर्ज काढले नव्हते. ३३ कोटींच्या डिस्टीलरीवर यांनी १०० कोटींचं कर्ज काढलं, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. २८ वर्षे मी तिथे आहे. कधीच कर्ज काढले नव्हते यांनी मात्र १०० कोटी कर्ज काढले.
पुणे जिल्हा बँकेचे कर्ज काढले, २०० रुपयांसाठी आता कर्ज काढले आहे. माळेगावच्या उसाचे वजनाचे पैसे वजनानुसार आणि योग्य त्या व्यक्तीलाच मिळाले पाहिजे, मात्र बारामतीच्या एकाच्या खात्यात पैसे आले. पैसे तर खात्यात आले पण त्या सभासदाचा त्या महिन्यापर्यंत ऊसच गेला नव्हता, मग पैसे कसे आले? तो सभासद प्रामाणिक होता, म्हणून कारखान्याच्या खात्यात पैसे परत गेले, असेही ते म्हणाले.