राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण! ठाकरे बंधुंच्या विजयी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंना सुद्धा निमंत्रण देणार..

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर वाद सुरु आहे. सरकारने पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत सरकारला थेट इशारा दिला होता. याबाबत आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत विजयी मेळावा घेणार आहेत.
याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. मला सवय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं की, आहोत आम्ही सगळे. टायगर अभी जिंदा हैं.
पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करणार आहोत. त्याचं त्यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत. त्यांनी पहावा विजय दिवसाचा हा सोहळा काय आहे. मराठी भाषेसंदर्भात, हिंदी सक्तीसंदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, तो महाराष्ट्र द्वेष्टयांवरचा विजय आहे. म्हणून त्यांना जयमहाराष्ट्र केला” असं संजय राऊत म्हणाले.
तसेच राऊत म्हणाले, काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्ध ठाकरे यांच्याशीही माझी चर्चा झाली. वरळीला डोम सभागृह आहे, तिथे हा सोहळा होईल. शिवसेनेने आधी शिवतीर्थ मिळावं यासाठी अर्ज केलेला. हा अर्ज पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सरकार परवानगी देणार नाही हे आम्हाला माहित आहे.
मनसे प्रमुखांनी डोमचा पर्याय सुचवला. आम्ही स्वीकारला सर्वांची काल बैठक झाली. कार्यक्रमाच स्वरुप काय असावं, कसं असावं, किती माणस येतील, यावर चर्चा केली असं संजय राऊत म्हणाले. पापाचा द्वेष करा, पाप्याचा द्वेष करु नका असा एक इंग्रजीत सुविचार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर वाद सुरु आहे. सरकारने पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला.