शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणार महिन्याच्या ५ तारखेलाच रक्कम ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ..!!

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याचा ५ तारखेला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले आहेत. त्यामुळे आता शासकीय लाभार्थींचे पैसे आता वेळेत जमा होण्यात मदत मिळणार आहे.
राज्यात सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. या लाभार्थ्यांत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग यांसारख्या योजना आहेत. मात्र या अत्यावश्यक मदतीचा गरज असणाऱ्या घटकांना वेळेत रक्कम जमा होत नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना
समोर जावे लागत आहे.
यासंदर्भात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.