नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद रद्द करण्याची मागणी, नेमकं कारण काय? काँग्रेस कोर्टातही जाणार…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये आचारसंहितेचा भंग केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद, लोकसभा सदस्यत्व रद्द करा अशी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली.

याबाबत ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या 100 व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या.
सगळीकडे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यासाठी कोणती परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे आदर्श आचारसंहितेचा उघड भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. यासाठी कमिटी तयार करण्यात आली आहे.
यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.