ठरलं!! 29 ऑगस्ट, ठिकाण मुंबई, मागणी नाही निर्णय घेण्यासाठी मुंबईत जायचं, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार…

जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. ते म्हणाले, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार आहे. मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. यामुळे आता सरकारचे टेन्शन वाढले आहे.
मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू आहे. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे.
पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले. यामुळे आता येणाऱ्या काळात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यात वातावरण तापणार आहे.