बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री ? अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे:सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. यावेळी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लागण्याची शक्यता आहे.

गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना राज्य सरकार आर्थिक पाठबळ देते. त्याआधारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येते. शिष्यवृत्तीच्या बळावर त्यांना पीएचडी आणि इतर उच्च शिक्षण पूर्ण करता येते. त्यासाठी राज्य सरकार टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. पण आता या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे.
बार्टीच्या शिष्यवृत्तीबाबत विधानसभा सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. एकाच कुटुंबातील अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होईल. त्यामुळे यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकाच कुटुंबातील अधिक सदस्य जर शिष्यवृत्तीत आढळले तर यासंबंधीचे नियम तयार करुन त्यांना अटकाव होऊ शकतो.

दरम्यान टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते. पण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची खातरजमा करण्यात आल्यानंतर या योजनेत आता पारदर्शकता आणण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लागणार आहे.