राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन ! देशाला घटनाकारांनी दूरदृष्टी दिली आहे,देशहित पाळण्याची सर्वांची जबाबदारी-द्रौपदी मूर्मू

नवी दिल्ली : आपल्या राज्यघटनेची पायाभरणी करणाऱ्यांनी आपल्या मार्ग दाखवून आणि नैतिकतेची चौकट आखून देत मार्गावरून चालत राहणे ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली आहे. घटनाकारांनी दाखविलेली दूरदृष्टी ही आपल्या प्रजासत्ताकाची मार्गदर्शक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.
७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांचा परामर्श घेतला आहे . मुर्मू यांचे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेले हे पहिलेच भाषण होते. त्या म्हणाल्या, घटना समिती अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत हा देश त्यांचा कायमच ऋणी राहील. आजच्या दिवशी विधिज्ञ बी. एन. राऊ यांचेही राज्यघटनेतील योगदानासाठी स्मरण केले पाहिजे. या घटनेमध्ये देण्यात आलेली दृष्टी ही आपल्या प्रजासत्ताकाची मार्गदर्शक आहे. या काळात एकेकाळी गरीब आणि अशिक्षितांचा देश असलेला भारत आता जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने पाऊले टाकत आहे. राज्यघटनेतील सामुदायिक शहाणपणा खेरीज हे शक्य झाले नसते, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.
शैक्षणिक धोरणामुळे बदल
देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाकांक्षी बदल घडवून आणण्यासाठी आणले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आपली अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असताना आपण अनेक चांगली धोरणे राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्व नागरिकांना त्यांची वैयक्तिक आणि सामुदायिक ताकद माहिती करून देणे हे या धोरणांचे अंतिम उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे असे मोठे बदल घडू शकतात, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.