पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी! १० हजार रुपयांची मदत ‘या’ तारखेला थेट खात्यात जमा होणार, जाणून घ्या…


पुणे : सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीच्या पुरामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे बाधित कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली की, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या पूरग्रस्तांच्या बँक खात्यात बुधवार, १ ऑक्टोबरपासून प्रत्येकी दहा हजार रुपये मदत रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, पूरग्रस्तांना सध्या १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू यांचे वाटप सुरू आहे. तसेच, घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना रोख स्वरूपातही मदत दिली जाणार आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ८८ गावे (माढा २२, करमाळा ११, मोहोळ २१, अक्कलकोट १०, उत्तर सोलापूर ९ आणि दक्षिण सोलापूर १५) बाधित झाली आहेत. या भागातून आतापर्यंत ४ हजार ५२१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यात एकूण १२० निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये १२ हजार ९५६ लोकांना आश्रय देण्यात आला आहे.

पुरामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाय म्हणून शेजारच्या जिल्ह्यांतून चारा आणला जात आहे. शनिवार आणि रविवारी मिळून २० टन चाऱ्याचे वाटप झाले असून, हा आकडा १०० टनांपेक्षा जास्त करण्याची योजना आहे. पुरामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान झाले आहे. यात १०३ मोठी आणि ५३ लहान जनावरे दगावली आहेत. कुक्कुटपालन केंद्रांमध्येही १८ हजार ४१ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखाने, बँका आणि विविध संस्था पूरग्रस्तांसाठी मदतीला पुढे सरसावल्या आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, बाहेरून मदत आली तर आम्ही स्वागत करू, मात्र जिल्हा प्रशासन सध्या स्वतंत्रपणे परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. आलेली प्रत्येक मदत आम्ही नियोजनपूर्वक लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!