महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; 9 जानेवारीपासून अलर्ट जारी, हवामान विभागाचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नऊ जानेवारीपासून राज्यात थंडीचा कडाका अधिक वाढणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस थंडीची तीव्रता अधिक राहणार आहे.. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने राज्यात शीतलहरी येत आहेत. दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट आहे. दिवसाही थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरत आहे. विशेषतः मुंबई पुणे आणि आसपासच्या भागात हवामानात गारठा वाढला आहे.
पुणे शहरातील किमान तापमानामध्ये गेल्या काही दिवसात लक्षणीय रित्या वाढ झाली होती. मात्र, किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून नोंदवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यासह मुंबई आणि उपनगरात कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे तर किमान तापमान 19 ते 21 अंशाच्या आसपास असण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे.