उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा, पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा, कॉपी केल्यास…

पुणे : उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. त्यामुळे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून अभ्यास करत आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे.

तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. अशातच आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली.
नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. 3387 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे असणार आहेत. तर 3,80,692 विद्यार्थी हे कला शाखेची परीक्षा देणार आहेत. तर 3,20,152 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायंन्सचेही काही विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

पुढे बोलताना नंदकुमार बेडसे यांनी म्हटले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत.
बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी 11 वाजता आणि काही पेपर दुपारी 3 वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.
यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी बोर्डाने कंबर कसली असून, प्रत्येक परीक्षा खोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहेत. ज्या केंद्रामध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाही, अशा केंद्रामधील कर्मचारी दुसऱ्या केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा फायदा घेता येणे शक्य होणार नाही. यावर्षी सर्वच केंद्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणण्यात आले आहे.