मुख्यमंत्री महोदय आमची अंडी का बंद केली? जाहिरातीसाठी 200 कोटी आहेत, मग विद्यार्थ्यांना 50 कोटी नाहीत का? पोषक आहारातून अंडी बंद..

मुंबई : राज्य सरकारने विद्यार्थ्यांबाबत एक निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामध्ये शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत काही प्रश्न केले आहेत.

यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत आव्हाड पोस्ट करत म्हणाले, की मान्य आहे की अंडे हे काही एकमेव प्रोटीनचे सोर्स नाहीत. त्याला काहीतरी रीप्लेसमेंट नक्कीच असू शकते. परंतु या राज्यात लाडकी बहीण साठी 200 करोड रुपयांची जाहिरात करण्याचे पैसे राज्याकडे आहेत.
असे असताना वर्षाला 50 कोटी रुपये अंड्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शारीरिक हितासाठी, राज्य सरकारकडे नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे. असो. लाडकी बहिण खुश असली की बास झालं.. विद्यार्थी थोडीच आपले मतदार आहेत.. अशी या सरकारची मानसिकता आहे, हे मात्र जनतेच्या आता लक्षात आलं आहे. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

महोदय, हा २४ लाख लाभार्थी विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती शक्यतो चांगली नसते, बेताची असते. त्यामुळे ते शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो.
शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिन त्यांना मिळत नाहीत, म्हणूनच या आधीच्या राज्य सरकारांनी या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी पूरक ठरेल म्हणून त्यांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा अंडी व इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो आता बदलला आहे.
तसेच आव्हाड म्हणाले, विद्यार्थ्यांना एक वेळ अंडी देण्याचा वार्षिक खर्च हा केवळ 50 कोटी रुपये आहे. हा माझा नाही तर सरकारी आकडा आहे आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या जाहिरातीचा खर्च हा 200 कोटी रुपयांचा आहे. आपल्याकडे 50 कोटी नाहीत हे न पटणारे आहे, असंही आव्हाड म्हणाले.