छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे मांसाहार करायचे, वरणभात खाऊन युद्ध लढता येत नाही….!! संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई : सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असून हा निर्णय नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिका क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यदिनी मांस, मच्छीची दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरुन वाद विवाद सुरु आहे. यामुळे भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन आहे, हा धार्मिक उत्सव नाही. देशाला हे स्वातंत्र्य पंतप्रधान मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले नाही.
तुमच्याकडे 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवा, अशी मागणी कोणी केली आहे का? हे काय नवीन थोतांड आहे, याचे जनक कोण, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे. लोकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे काय वरण-भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते. ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे. बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे. त्याशिवाय युद्ध लढता येत नाही. सीमेवरील भारतीय सैन्यातील जवानांनाही मांसाहार करावाच लागतो ना? असेही ते म्हणाले.
यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राला नपूसंक आणि नामर्द करत आहात. तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करु नका. पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदिशाळा बनवली आहे. असेही राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे. याबाबत सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.