ब्रेकिंग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांच्यात २० मिनिटे चर्चा ; भेटीच कारण काय?

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या एका खाजगी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही नेमकी भेट कशासाठी झाली यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. आयएएस अधिकारी नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही आहेत. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रम म्हणून संजय राऊत कुटुंबासह या विवाहाला उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विवाह सोहळ्याला उपस्थित राहत नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात २० मिनिटं चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत उपचारांची माहिती घेतली. या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय राऊत यांच्यासोबत आशिष शेलार यांनीही संवाद साधला. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.राजकीय दृष्टीने परस्परांवर टीका–टिप्पणी करणारे हे दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वादावादी समोर आली. त्यामुळे महायुतीमध्ये फारसं आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. राज्यात भाजपसोबत असलेल्या धुसफूसीचा मुद्दा दिल्लीतही पोहचला. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

