पुण्यात विहिरीत २ लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह, हादरवणारे कारण समोर, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये हादरवणारी घटना समोर आली आहे. एका विहिरीमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थोरस्थळ वस्ती परिसरात घडली आहे.

अहिला जाधव (वय.३० वर्षे), सार्थक जाधव (वय. ५ वर्ष), गौरी जाधव (चार महिने) अशी मृतांची नावं आहेत. हे सर्वजण मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.


नेमकं काय घडलं?
विवाहित महिलेचे पती राजू जाधव याच्यासोबत रविवारी (ता.१ फेब्रुवारी) भांडण झालं होतं. या भांडणानंतर अहिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत घराबाहेर पडली. ती घरी न परतल्यानं पतीने शोधाशोध करण्यास सुरुवात केली.
शोधाशोध सुरू असताना गौरी जाधव या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीचा मृतदेह थोरस्थळ येथील एका विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला. त्याच विहिरीत अहिला जाधव आणि मुलगा सार्थक जाधवचही मृतदेह सापडला.
या घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पती चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण करत असल्याच्या गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने दोन मुलांसह जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
